बुधवार, ८ मे २०२४
8 May 2024

निरूपम देवरा भांडणामुळे मातोंडकर शिवसेनेत
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रभारींची चाचपणी

अतुल कुलकर्णी / लोकमत
मुंबई : संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्या आपापसातील भांडणांना कंटाळून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मुंबई काँग्रेस मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष ठरवण्यासाठी काँग्रेसला मुहूर्त सापडलेला नाही. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यात ते नव्या अध्यक्षासाठी चाचपणी करत असले तरी नेत्यांची आपापसातली भांडणे त्यांच्यासाठीही डोकेदुखी झाली आहेत.

काँग्रेस पक्षाने ऊर्मिला मातोंडकर यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी दिली होती. मातोंडकर यांनी ही निवडणूक देशभर चर्चेत आणली. त्यांच्यामुळे मुंबई कांग्रेस चर्चेत आली. मात्र मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील भांडणाचा फटका त्यांना बसला. सगळ्या गोष्टी पक्ष नेत्यांना सांगून देखील काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर, मातोंडकर यांनी मातोश्री चा रस्ता धरला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रुपाने काँग्रेस सत्तेत आहे. असे असतानाही निरुपम सातत्याने शिवसेनेच्या विरोधात विधाने करत असल्याने शिवसेनेत या विषयी नाराजी आहे. ही गोष्ट दिल्लीच्या कानावर घातल्यानंतरही निरुपम यांना पक्षाने बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून पाठवले. जी व्यक्ती आपल्याच सरकारच्या सहकारी पक्षाबद्दल सतत विरोधी भूमिका घेत असताना त्यावर कारवाई होत नाही तेथे आपले काय, म्हणूनच मातोंडकर यांनी शिवसेनेचा रस्ता धरल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे प्रभारी पाटील यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. लवकरच मुंबईला नवीन अध्यक्ष देऊ असे ते म्हणत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी देखील मातोंडकर सारखी आत्मविश्वासू, निडर अभिनेत्री शिवसेनेत जाणे काँग्रेससाठी मोठे नुकसान आहे. शिवसेनेचा फायदा असला तरी काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे ट्विट केले. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या बदलाविषयी चर्चेला जोर आला आहे. मातोंडकरमुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी घराघरात सहजपणे जाऊ शकणारा मराठी चेहरा काँग्रेसने गमावल्याची टीका होत आहे.

दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी भाई जगताप, नसिम खान, अमरजितसिंह मनहास आणि सुरेश शेट्टी या नावांची चर्चा सुरू आहे. भाई जगताप मराठा आहेत. प्रदेशाध्यक्ष पदही मराठा समाजाकडे आहे. त्यामुळे भाई जगताप यांना दुसरी जबाबदारी द्यावी, असा सूर आहे. मुंबईत शिवसेनेसोबत निवडणूक एकत्र लढवायची आहे. त्यामुळे सगळ्या गटांना सोबत घेऊन जाणारा, शरद पवार यांच्यापासून उद्धव ठाकरे पर्यंत सगळ्या नेत्यांची थेट बोलू शकणारा, संवाद कौशल्य असणारा नेता अध्यक्षपदी निवडावा असा सूर आहे. या निकषात सुरेश शेट्टी यांचे नाव आघाडीवर असले तरी अद्याप दिल्लीने कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. मनहास देखील आग्रही आहेत, पण ते दोन वेळा महापालिका निवडणुकीत व एकदा विधान परिषद पदवीधर मतदार संघात पराभूत झाले आहेत. सुरेश शेट्टी यांचे मुंबईत असणाऱ्या ओळखी, आरोग्य मंत्री म्हणून केलेले काम, शिवाय सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध या जमेच्या बाजू आहेत. मात्र ते देखील मावळत्या विधानपरिषद पराभूत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी कोणाचे नाव घेऊन दिल्लीला जातात, आणि मुंबईला नवा अध्यक्ष कधी मिळतो, हा सध्या काँग्रेस पुढे कळीचा प्रश्न बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *