सोमवार, ९ जून २०२५
9 June 2025

तरीही पुण्याला जायला सहा तास का लागतात?

अतुल कुलकर्णी / मुक्काम पोस्ट मुंबई

Mumbai-Pune Traffic :  चार दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला जावे लागले. दुपारी चार वाजता मुंबई सोडली. पुण्यात कोरेगाव पार्कला पोहोचायला रात्रीचे दहा वाजले. वाटेत थोडा वेळ थांबलो, तरी पाच-साडेपाच तास लागले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला. मुंबईतून एक्स्प्रेस वेवर जाण्यासाठी अटल सेतू झाला, तरीही एवढा वेळ का लागतो? याचे उत्तर जागोजागी दिसले. कितीही वेगवान मार्ग केले, तरी ते मार्ग जेवढ्या अंतराचे आहेत तेवढ्याच मार्गावर वाहतूक व्यवस्थित होते. जिथे हे मार्ग संपतात त्या ठिकाणी पुन्हा वाहतूककोंडी कायम असते. अटल सेतू असो किंवा समृद्धी महामार्ग. मुंबईत येताना किंवा मुंबई बाहेर जाताना, हे मार्ग जिथे संपतात अथवा सुरू होतात, त्या प्रत्येक ठिकाणी वाहतूककोंडी कायम आहे. त्यामुळे हजारो कोटी खर्च करून उभारलेले महामार्ग जर कोंडी सोडवायला पुरेसे ठरत नसतील, तर नियोजनच कुठेतरी फसले आहे.

मुंबईतून अटल सेतूला वडाळा मार्गे जाताना वाटेत ठिकठिकाणी वाटेल तिथे लावलेल्या हातगाड्या, अतिक्रमण करून थाटलेली दुकाने, त्यातून झालेली कोंडी यांचा सामना करत जावे लागले. वरळीहून अटल सेतूला जोडला जाणारा मार्ग प्रभादेवीच्या कनेक्टिंग पुलाअभावी रखडला आहे. मधल्या दोन-तीन इमारतींनी आमच्या पुनर्वसनाचे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा मार्ग पुढचे दोन-तीन वर्षे तरी पूर्ण होत नाही. अटल सेतूवरून पनवेलला उतरून जेएनपीटी मार्गे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जाताना ठिकठिकाणी वाहतूककोंडी होते. जितका वेळ वडाळ्याहून पनवेलला लागला, त्याच्या दीडपट वेळ या वाहतूककोंडीने घेतला. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच बंद पडलेल्या ट्रकमुळे वाहतूककोंडी झाली होती. मात्र, तिथल्या पोलिसांना त्याचे काही घेणे-देणे नव्हते. प्रत्येक जण जिथून गाडी पुढे दामटता येईल, तिथून पुढे जात होता. पुण्यातून कोरेगाव पार्कला म्हणजे दुसऱ्या टोकाला जातानाही यापेक्षा वेगळा अनुभव नव्हता.

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचा आमने टप्पा पूर्ण झाला. तो ओलांडून ठाण्याच्या दिशेने येताना जीव नकोसा होणे कायम आहे. ठाण्यातून नाशिकला जाण्याचा मार्ग सोपा झाला, तरी ठाण्यातून समृद्धी महामार्ग गाठेपर्यंत जीव जातो. अटलसेतू वरून फ्री वे मार्गे, सीएसएमटीकडे उतरल्यानंतर एशियाटिक आणि तिथून मंत्रालयाकडे येण्याचा मार्ग कायम वेळ खाणारा आहे. त्यावर कसलाही तोडगा निघालेला नाही. तीच परिस्थिती कोस्टल रोडची आहे. वरळी सी लिंकवरून चौपाटीकडे तुम्ही काही मिनिटांत पोहोचता. मात्र, चौपाटीवरून मंत्रालयाकडे जाणारी कोंडी कायम आहे, तसेच सी लिंक संपून विमानतळाच्या दिशेने जाताना वाहतूककोंडी तुमच्यासोबत असते. संध्याकाळच्या वेळी दादर ते अंधेरी अंतर बायरोड ४५ मिनिटांत जो कोणी पूर्ण करून दाखवेल त्याला बक्षीस दिले पाहिजे. सकाळी बीकेसीत जाताना आणि संध्याकाळी बीकेसीतून बाहेर येताना दोन तास लागणे आता सवयीचे झाले आहे. बीकेसीमध्ये आधी सायकल ट्रॅक करण्यात आले. वाहतूककोंडीचे कारण पुढे करत ते तोडून टाकण्याचा निर्णय झाला. बीकेसीमधून ठाण्याला जाण्यासाठीचा जो ब्रिज झाला आहे, तो ओलांडतानाही हीच अवस्था होते.

बीकेसी नव्याने वसवलेली आहे. तिथे तरी निदान भविष्याचा विचार करून रस्त्यांची लांबी, रुंदी किती असावी, याचे नियोजन करायला हवे होते. मात्र, पुढच्या दोन-पाच वर्षांचा विचार करून काम करायचे, पुन्हा तोडफोड करायची, पुन्हा टेंडर काढायचे, तीच-तीच कामे परत-परत करत राहायचे. या मागचे हेतू आता लहान मुलालाही समजतात. नवी मुंबईच्या नियोजनाला अनेक वर्षे झाले. मात्र, आजही नवी मुंबईत मोठी वाहतूककोंडी झाल्याच्या बातम्या कानावर येत नाहीत. कधीतरी तिथल्या स्टेडियमवर सामने किंवा संगीताचे कार्यक्रम असतील, तर तेवढ्यापुरती वाहतूककोंडी होते. पण, तीही तासाभरात मोकळी होते. मात्र, बीकेसीमधल्या वाहतूककोंडीला मोकळे होण्यासाठी सरासरी दोन ते अडीच तास लागतातच. नियोजन केले नाही, तर काय होते यासाठी हे पुरेसे ठरावे.

पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करून आम्ही पायाभूत सुविधा उभ्या करत आहोत, असे दावे प्रत्येकाने केले. मात्र, हाती घेतलेले काम पूर्ण व्हायलाच दहा वर्षे लागतात. त्यावरचा खर्च वाढतो. वाहतूककोंडी हा विषय या सगळ्यात बाजूला फेकला जातो. कितीही पूल बांधले, कितीही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, तरीही जोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार नाही ,तोपर्यंत वाहने रस्त्यावर येतच राहतील. गेल्या वर्ष सहा महिन्यांत किती नव्या पुलांचे उद्घाटन झाले आणि त्यामुळे तिथल्या वाहतुकीची कोंडी कमी झाली की वाढली, याचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला, तर सत्य समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!