सोमवार, २९ एप्रिल २०२४
29 April 2024

एवढा पारदर्शक कारभार कधी पाहिला होता का..?

अधून मधून / अतुल कुलकर्णी

नमस्कार

आजचे पत्र कोणाला लिहायचे हा प्रश्न आम्ही आमच्यापुरता निकाली काढला आहे. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, गुंडपुंड, सामान्य जनता, भारी जनता, विशेष भारी जनता ज्यांनी त्यांनी हे पत्र आपल्यापुरते वाचून घ्यावे. जर आपल्याला काही संदर्भ मिळतेजुळते वाटले तर तो केवळ योगायोग समजावा. महाराष्ट्रात काय चालू आहे… असे कोणी विचारले, की आम्ही फॉग सुरू आहे, असे उत्तर देतो. म्हणजे फार तपशील सांगत बसावा लागत नाही. एकदा का जनता जनार्दनाच्या मतांवर निवडून आलो की कोणालाही, कोणत्याही पक्षात, कधीही जायला मोकळीक आहे. कोणीही त्यांना अडवत नाही. एवढा मोकळेपणा आमच्यात ठासून भरलेला आहे. एकाच पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर काही महाभाग दोन्ही पक्षांना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र देऊन मोकळे होत आहेत. हे असे करता आले पाहिजे. एकाच वेळी दोन घरात घरोबा करणे सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी तुमच्यात विशेष गुणवत्ता असावी लागते. ती असणारेही सध्या महाराष्ट्रात भरपूर आहेत.

अमुक नेता, अमुक पक्षात चालला अशा बातम्या आल्या की, तो नेता आधी या बातम्यांचा स्पष्ट शब्दात इन्कार करतो. नंतर दोन दिवसांनी हळूच त्या पक्षात जातो. दुसऱ्या पक्षात गेले की त्याला एकदम विकासाचे प्रश्न आठवतात. विकासाला गती देण्यासाठी आपण अमुक पक्षातून, तमुक पक्षात आलो, असे सांगताना तो त्याच्या मतदारसंघासाठी किती झटत आहे हेदेखील दाखवतो. मतदारसंघासाठी झटणारे असे नेते पाहून मतदारांचा आनंद गगनात मावत नसेल. भूमिका बदलणे, काल जे बोललो होतो त्याच्या नेमके विरुद्ध दुसऱ्या दिवशी बोलणे, याची फार मोठी परंपरा आहे.

ही गोष्ट १९७८च्या दरम्यानची. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारमध्ये यशवंतराव मोहिते अर्थमंत्री होते. शरद पवारही त्याच मंत्रिमंडळात होते. पवारांनी राजीनामा दिला आणि दादांचे सरकार पडले. (शरद पवारांना तेव्हापासूनच ‘दादा’ ग्रह वक्री असावा.) शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तेवर आले. यशवंतराव मोहिते यांनी वसंतदादांच्या सरकारमध्ये १२ जून १९७८ रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार पडले. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार मुख्यमंत्री झाले. परिणामी यशवंतराव मोहिते यांना विरोधी बाकावर बसावे लागले. सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होती. तेव्हा याच यशवंतराव मोहिते यांनी आपणच मांडलेला अर्थसंकल्प चुकीचा व राज्यविरोधी असल्याची टीका केली होती.

ही अशी परंपरा असताना आता भूमिका बदलणाऱ्यांवर उगाच टीका करणे योग्य नाही. त्याकाळात सभागृहात जांबुवंतराव धोटे यांनी अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारला होता. त्यावेळी मोबाइल नव्हते. काळ बदलल्यामुळे मोबाइल, सोशल मीडिया आला. त्यामुळे आता पेपरवेट फेकून मारण्याऐवजी फेसबुक लाइव्हवरून गोळ्या मारल्या जातात. काळानुरूप स्वतःमध्ये बदल करणाऱ्यांचे कौतुक करायचे, की त्यांच्यावर टीका करायची? अगदी काही वर्षांपूर्वी गृहमंत्री असताना आर. आर. पाटील यांच्या व्यासपीठावर एक गुंड आला म्हणून राज्यभर गहजब झाला. पण काळ पुन्हा बदलला. पूर्वी गुंडांना राजकारणी चार हात दूर ठेवायचे. आता गुंड राजकारण्यांकडे जातात, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतात. गुंडांच्या घरी जाऊन सत्कार घेतात.

जुन्या काळात एखाद्याने गुन्हा केला तर ‘तो मी नव्हेच’ असे सांगितले जायचे. त्यावरून तर प्रभाकर पणशीकर यांनी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक रंगभूमीवर गाजवले. काळाचा महिमा अगाध असतो हेच खरे. आता इतके पारदर्शक राजकारण झाले की पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार असो की एखाद्या गल्लीत कोणावर झालेला गोळीबार असो… अथवा ऑफिसमध्ये झालेला गोळीबार… सगळ्या गोष्टी आपण घरी बसून निवांत पाहू शकतो. पारदर्शक कारभार यापेक्षा वेगळा असतो का..? याआधी राज्यात इतका पारदर्शक कारभार तुम्ही कधी पाहिला होता का? त्यामुळे उगाच टीका करण्यात काही अर्थ नाही. ज्यांना काही कामधाम नाही, असे लोक विनाकारण चांगल्या गोष्टींवरही टीका करत राहतात. मुळात आपल्याला चांगल्या गोष्टींचे कौतुक नाही हेच खरे. एकमेकांच्या अंगावर कसे धावून जावे? दगडफेक कशी करावी? गाडीच्या काचा कशा फोडायच्या? गोळी झाडताना बंदूक कशी धरावी? या सगळ्यांचे धडे तुम्हाला घरबसल्या मिळत असतील तर विनाकारण तक्रारी करण्यात अर्थ नाही. तेव्हा आनंदात राहा. आज संडे आहे. हे वाचा आणि शांत बसा. भूक लागली की गरमगरम खायला बनवा. आराम करा. संध्याकाळी डान्स इंडिया, आयडॉल बघा. हास्य जत्रेत सहभागी व्हा. तुम्हाला रविवारच्या शुभेच्छा.

– तुमचाच
बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *