गुरुवार, २८ मार्च २०२४
28 March 2024

पोलीसहो, आता तरी बेदिली थांबवा..!

दिव्याच्या गाड्या घेऊन, सायरन वाजवत फिरणाऱ्यांवर जनता उलटू शकते…

“चला…चला…चला…कॅन्डल तयार करा… जेथे स्फोट घडला तेथे जमूया! आता मनमोहनसिंग आतंकवाद्यांना रागवणार… गृहमंत्री आबा पाटील वाकडी नजर करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याची घोषणा करणार… सगळे घाबरणार…!”
प्रसाद पुरंदरे यांच्याकडून आलेला हा एक उद्वीग्न करणारा प्रातिनिधीक एसएमएस. तो या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करण्यास पुरेसा आहे. सामान्यजनांची सहनशिलता आता टोकाला आली आहे. दरवेळी हल्ले झाले की त्याच त्या भेटी, तीच ती आश्वासने, तेच ते आंदोलन… ज्यांचे जीव गेले, ज्यांना आयुष्यभराचे अपंगत्व आले त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी ना कोणाला घेणे देणे, ना कोणाला साधे सोयरसुतक. ९/११ नंतर अमेरिकेत पुन्हा तशी घटना कधीही घडली नाही, आपल्याकडे मात्र स्फोटांची मालिका संपत नाही हे देखील प्रत्येकवेळी सांगून झाले. मात्र आमची मानसिकता आहे तशीच आहे. आम्हाला आमच्याच भांडणातून अजूनतरी वेळ मिळालेला नाही. मुंबई पोलीस दलात उभी फूट पडली आहे हे पंतप्रधानांनीच सांगितले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील पोलीसांवरील होणारी प्रत्येक टीका स्वत:वर झालेली टीका समजू लागले आहेत. त्यामुळे अधिकारी मात्र मोकाट वागू लागले आहेत. साहजिकच त्यांचा उरला सुरला धाकही संपला आहे. प्रत्येकाला मलाईदार पोस्टींग हवी आहे, आबा बदल्यांमध्ये पैसे घेत नाहीत हे आता छोटे मुलंही सांगेल पण ते ज्यांच्या बदल्या करतात ती मंडळी आपापल्या हद्दीत ‘मॉल’ उघडून बसली आहेत. कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, प्रत्येक अधिकाऱ्याची बदली कोणत्या ना कोणत्या आमदाराच्या शिफारशीशिवाय होत नाही. एसआयडी, एटीएस काय करतात याचा कोणी कधी जाब विचारत नाही. विचारला गेला तरी तो कधी समोर येत नाही. एसआयडीने कधी मोठी खळबळजनक माहिती समोर आणली आणि त्यातून मोठी दूर्घटना टाळता आली असे एकही उदाहरण गेल्या दहा वर्षात समोर आलेले नाही. एसआयडी किंवा सीआयडी मध्ये नोकरी मिळाली तर पेढे वाटले जायचे. असा सन्मान या पदाला त्यावेळचे प्रमुख बी.एन. देशमुख यांनी मिळवून दिला होता. आज या जागेवर बदली म्हणजे शिक्षा असे चित्र तयार झाले. कोणालाही इंटीलीजन्स मध्ये काम करण्यात रस नाही कारण त्या जागी अपेक्षीत कमाई नाही. बाकी अधिकाऱ्यांचा ‘वेग’ पाहून सगळ्यांनाच तसे होण्याची इच्छा बळावू लागली आहे. जगात कोणत्याही देशात जा, तेथे पोलीस ठाण्यात मिळणारी बदली म्हणजे कमीपणा समजला जातो. आपल्याकडे मात्र प्रत्येकाला मनासारखे पोलीस ठाणे हवे आहे. ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातोय.

मुंबईतचाच विचार केला तर या शहरातील १२ झोन पैकी किती झोनचे डीसीपी अनोळखी नंबरवरुन आलेला फोन उचलतात? सामान्यांना सहजपणे उपलब्ध होतात? कितीवेळा ते रात्रीच्या गस्तीच्यावेळी स्वत: हजर असतात? मुंबईत २६ अ‍ॅडीशनल डीजी आहेत त्यातल्या किमान १० जणांकडचे फारसे कामच नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक स्वत:च जर सहा फूट उंचीचे दोन बॉडीगार्ड घेऊन फिरत असतील तर मुंबईकरांनी स्वत:ला कशाच्या भरवश्यावर सुरक्षीत समजायचे. दहा लाखाची रॉबरी किंवा चार हत्यारे पकडली की गुन्हे शाखा लगेच मिडीयाला बोलावून फोटो काढून घेण्यात स्वत:ला धन्यता मानते. प्रत्येकाला चांगली पोस्टींग आणि नेत्यांसारखे स्वत:चे फोटो छापून यायला हवेत. ज्याची जेवढी प्रसिध्दी, तेवढा त्याचा ‘भाव’ जास्त! असा भाव जर सगळे मनी ठेवू लागले तर मुलभूत काम करायचे कोणी? जनजागरणासारखा साधा विषय, पण तो देखील कधी महत्वाचा मानला जात नाही, पोलीस मित्र सारखी गोष्ट कधी प्राधान्याने पाहिली जात नाही.

५५ हजार लोकांची पोलीसात भरती झाली, त्यासाठी कोणाला एक पैसाही द्यावा लागला नाही, मेरीटवर त्या पोस्टींग झाल्या. दरवर्षी होणाऱ्या घाऊक बदल्या-बढत्या देखील छदाम खर्च न होता होऊ लागल्या. त्याबद्दल गृहमंत्र्यांचे कौतुक आहे. पण अतिरीक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी या खात्याकडे असताना, २६/११ नंतर जे जे ठरले ते का झाले नाही, त्यासाठी कोण कमी पडले, जॅकेट असोत की अन्य कशाची खरेदी असो, त्यात का विलंब झाला याचीही कारणे काय याचीही उत्तरे कोणाला नको आहेत. लोकांना मुंबई सुरक्षीत कशी राहणार या एकाच प्रश्नाचे उत्तर हवे आहे आणि ते पोलीस दलातील दुफळीत दडलेले आहे. प्रत्येक अधिकारी एकमेकाला जर पाण्यात पाहू लागला तर शिस्तप्रिय दल म्हणून ओळखले जाणारे हे दल एकेदिवशी राज्यालाच घेऊन बुडले अशी विदारक स्थिती आज निर्माण झाली आहे.

लोकांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न अतिशय बिकट बनलेले असताना, नाईलाज म्हणून लोक अशा घटनेनंतरही घराबाहेर पडतात, ती त्यांची मजबुरी असते. त्याला मुंबईकरांची दिलेरी म्हणून पाठ थोपटून घेऊ नका. सतत सगळे नियम धाब्यावर बसवून, दिव्याच्या गाड्या लावून, सायरन वाजवत फिरणाऱ्यांवर हे पिचलेले लोक हात टाकू लागले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तो दिवस आता फार दूर नाही. बेदरकार राजकारण्यांनी आणि मुजोर पोलीस अधिकाऱ्यांनी ही वेळ स्वत:हून आपल्या समोर ओढवून घेतली आहे.

जाता जाता

भाजपाची दोन रुप या घटनेत पहायला मिळाली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी संयम पाळण्याचे, पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत मात्र स्वत:च्या बालबुध्दीची झलक दाखवत फिरत होते. मृतांची ओळख पटलेली नसताना, जखमींचा शोधही संपलेला नसताना पुरोहीत मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री, सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत फिरत होते. त्यांनी जखमींना मदतीचा हात दिला असता, चार रक्ताच्या बाटल्या गोळा केल्या असत्या तर भाजपाची मान उंचावली असती. मात्र त्यांना ते अभिप्रेत नसावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *