शनिवार, २० एप्रिल २०२४
20 April 2024

पैसा झाला मोठा, पक्ष झाला छोटा..! राष्ट्रवादीत कोणालाच सुरक्षीत का वाटेना?

#अतुलकुलकर्णी

#मुंबई

विधानपरिषदेच्या निवडणुकीत बीड, लातूर मध्ये ३५ कोटी, हिंगोली-परभणीत १० कोटी, कोकणात, नाशिकमध्ये जवळपास १५ कोटी खर्च झाल्याचे आकडे निकालानंतर बाहेर येऊ लागले आहेत. खरे खोटे त्यांनाच माहिती पण पक्षापेक्षा पैसा मोठा झाला आणि पक्ष गुंडाळून प्रत्येकांनी आपापली सोय पहात डाव साधले. सहा पैकी ५ विधानपरिषदांच्या निकालाने पक्षीय फायद्या तोट्यापेक्षा चक्रावून टाकणारी वस्तूस्थिती समोर आणली आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भूजबळ यांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिक्रीया देताना भूजबळांचे जाहीर आभार मानले! राष्ट्रवादीचे शिवाजी सहाने यांनी भूजबळांना दिलेला त्रास आपण विसरलो नाही हे भूजबळांनी दाखवून दिले. मुंबईत शिवसेनेचे सचिव मीलिंद नार्वेकर यांनी भूजबळांची भेट घेतली, आणि त्यांच्याच फोनवरुन भूजबळांनी नाशकात अनेक फोन केले, परिणामी सहाने यांचा पराभव झाल्याचे उघडपणे बोलले जात असताना याचे खंडन ना भूजबळांनी केले ना राष्ट्रवादीने. विशेष म्हणजे नाशिकमध्ये भाजपाने शिवसेनेच्या विरोधात काम करण्याच्या सूचना दिल्यानंतरही शिवसेना निवडून आली. याचा अर्थ भूजबळ लगेच शिवसेनेत जाणार असा नसला तरी भूजबळांनी आपल्यापरिने तुरुंगातून बाहेर येताच राजकारण सुरु केले आहे.

विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा अशा दोन जागा भाजपाने लढवल्या. त्यातील अमरावतीची जागा प्रवीण पोटे यांनी सगळ्यांची मतं जाहीरपणे घेत विजय मिळवला. मात्र काँग्रेस पक्षाने व नेतृत्वानी या निवडणुकीत केलेले दुर्लक्ष, काँग्रेस उमेदवाराने लक्ष्मीदर्शनास दिलेला नकार यामुळे पक्षाची पुरती अप्रतिष्ठा झाली. हक्काची १२८ मते असतानाही त्यांना फक्त १७ मते मिळाली यासारखे दुर्देव नाही. चंद्रपूरची उमेदवारी रामदास अंबटकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. स्वत: सुधीर मुनगंटीवार त्यासाठी ठाण मांडून होते. तेथे काँग्रेस, राष्ट्रवादीची मते फक्त ३६९ एवढीच असताना ते ४९३ मते मिळवतात आणि अवघ्या ३५ मतांनी विजयी झाले. त्याच ठिकाणी ३६ मते बाद झाली ही भाजपासाठी चिंतेची बाब आहे की गडकरी गटासाठी याचे उत्तर येत्या काळात शोधले जाईल.

कोकणात सुनील तटकरे यांनी स्वत:च्या मुलाला, अनिकेत यांना विजयी करुन घरातल्या आणखी एका सदस्यांना सक्रिय राजकारणात आणले. आता त्यांच्या घरात आणखी कोणी शिल्लक असेल तर त्यांनाही पुढच्यावेळी उभे करा, नंतर आमचा विचार करा अशी टीका स्वपक्षातूनच सुरु झाली. राष्ट्रवादी विषयी त्यांच्याच पक्षातल्या लोकांना प्रेम वाटेनासे झाले आहे याची अनेक उदाहरणे या काळात घडली. निरंजन डावखरे यांनी आपल्याला आ. जितेंद्र आव्हाड त्रास देत आहेत, ते विरोधात काम करत आहेत, अशी तक्रार डावखरे यांनी दस्तूरखुद्द शरद पवार यांच्याकडे करुनही काहीच झाले नाही म्हणून ते भाजपाकडे गेले. बाबा जानी दुर्रानी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार होते. निवडून येण्याएवढे संख्याबळही त्यांच्याकडे होते. तरीही त्यांची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली.

बीड, लातूर मधून रमेश कराड यांना ज्या पध्दतीने भाजपातून राष्ट्रवादीत घेतले गेले, नंतर कराडांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादीला तोंडावर पाडले. कराड यांना पक्षात घेण्याचा आग्रह धरणारे अमरसिंग पंडीत, जगजितसिंह राणा यावर काहीच बोलायला तयार नाहीत. शरद पवार यांच्याच घरुन रमेश कराड यांना अर्ज भरण्याचा फोन गेला, मात्र तो कोणी केला याचाही शोध लागत नाही. याचा अर्थ, जी काही राजकीय खेळी खेळली गेली त्यात धनंजय मुंडे, पंडीत किंवा राणा पाटील यांची राजकीय कोंडी झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांनाच कात्रजचा घाट दाखवला असाच निघत आहे. अत्यंत धूर्त अशी ही खेळी देशाचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना कशी कळाली नाही याचीच चिंता राष्ट्रवादीला आहे.

नात्यागोत्याच्या पलिकडे राष्ट्रवादी पक्ष जायला तयार नाही, काँग्रेसमध्ये ‘मी आणतो तुम्हाला निवडून’ अशी जबाबदारी घेण्याची कोणाची मानसिकता उरलेली नाही, अशा स्थीतीत नुसते दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचे दाखवून विजय कसा मिळणार?

Devendra Fadnavis Ashok Chavan Sharad Pawar BJP Maharashtra Maharashtra Pradesh Congress Committee

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *