शनिवार, २० एप्रिल २०२४
20 April 2024

मुंबईत होणार पाच नवे उड्डाणपूल, दोन रस्त्यांचे चौपदरीकरण, ११०० कोटींची तरतूद

मुंबई दि. ८ – कल्याण, भिवंडी, ठाणे या ठिकाणी पाच उड्डाणपूल बांधण्याचा व राष्ट्रीय महामार्ग क्र ८ च्या रुंदीकरण व नुतनीकराचा निर्णय आज एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी ११०० कोटींची तरतूदही केली गेली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यांमधील २७ गावे आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांच्या विकास आराखड्यावर सूचना व हरकती मागविण्याचाही निर्णय आज झाला आहे.
शिवाय एमएमआरडीएने बांधलेल्या सर्व रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांमधर ध्वनी प्रदूषण नियंत्रक भिंती उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज एमएमआरडीएच्या संचालक मंडळाची बैठक झाली. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पुलांमध्ये कल्याणमधील राजनोली आणि मांडकोली जंक्शंन येथील दोन, भिवंडीतील बंजारपट्टी येथील एक व ठाण्यातील मुंब्रा जंक्शन आणि शिळफाटा येथील उड्डाणपुलांचा समावेश आहे. तसेच अर्नाळा-विरार-कानेर-शिरसाड-अंबाडी राज्यमार्ग आणि पडघा-वाशिंद मार्ग आणि कल्याण-बदलापूर-कर्जत-हाळफाटा राज्यमार्ग आणि कर्जत हा चौक राज्यमार्ग यांच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. रुंदीकरण आणि नुतनीकरणासाठी कटाईनाका ते बदलापूर आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ ते नालासोपारा-निर्मळ या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई एवढीच महानगर प्रदेशालाही वाहतूक व्यवस्थेची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. या विभागाकडे नवे विकास केंद्र म्हणून पाहिले जात आहे म्हणूनच हे प्रकल्प राबवणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. उत्तन-गोराई-मनोरी क्षेत्राला पर्यटन क्ष्यत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी जनतेकडून हरकती व सूचना मागविण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला.

या बैठकीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक खाजगी सहभाग तत्वावर करण्यासाठी प्राधिकरणाला औपचारिक मान्यताही दिली गेली. या बैठकीला महापौर श्रध्दा जाधव, आ. नवाब मलिक, आ. प्रशांत ठाकूर, राजहंस सिंह, आशिष जाधव, मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड, एमएमआरडीएचे आयुक्त राहूल अस्थाना, मनपा आयुक्त सुबोधकुमार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *