शुक्रवार, २९ मार्च २०२४
29 March 2024

भाग पाच

वेगळा विदर्भ हाच यावर उपाय
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांची भूमिका

मुंबई दि. १८ – या सरकारवर आता शेंबडं पोरंगही विश्वास ठेवणार नाही, सरकारमधील काही नेते केवळ आपापल्या जिल्ह्यांपुरते मर्यादित झाले आहेत मागास विदर्भाचा विकास करण्यासाठी वेगळा विदर्भ करणे हाच यावर चांगला उपाय आहे, अशी घणाघाती भूमिका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी घेतली आहे. तसेच कृष्णेच्या खोऱ्यात जेवढा खर्च झाला असे सांगितले जाते तो खर्च खरा आहे की फुगवटा याचा शोध घेण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील सिंचन अनुशेषाबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्त मालिकेवर व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी २१ हजार कोटी देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलताना मुंडे यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. ते म्हणाले, हे सरकार प्रामाणिक नाही, ज्यांच्याकडे महत्वाची खातील आहेत त्यांच्या मनात समतोल विकास करण्याची भावना नाही. अर्थमंत्री व जलसंपदा मंत्रीच मागास भागावर अन्याय करतात. त्यांच्या उक्ती व कृतीत समन्वय नाही.

आपणही सरकारमध्ये होता. त्यावेळी आपणच पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी दिला आणि आता विरोध का. या प्रश्नावर बोलताना मुंडे म्हणाले, मुळात आमच्या काळात राज्यपालांचे निर्देश नव्हते. तरीही आम्ही ५८५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी व्यापक भूमिका घेत पैसे दिले त्याचवेळी विदर्भातील १० मोठ्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठीही विदर्भ विकास महामंडळ केले. मराठवाड्यात जायकवाडी कॅनॉल पूर्ण करण्यासाठी ६०० कोटी दिले. नांदूर मधमेश्वरचे काम आम्ही पूर्ण केले. पण या सरकारने राज्यपालांच निर्देश पाळले नाहीत शिवाय या भागांचे पैसेही तिकडे वळविले.

आपल्या काळात किती पैसे कोणत्या भागाला दिले गेले याची माहिती मांडली तर तुमचा आक्षेप आहे की नाही…?

या प्रश्नावर मुंडे यांनी १९९५ ते १९९९ या पाच वर्षात जेवढे पैसे सिंचनासाठी दिले गेले तेवढे त्या आधी कधीच दिले गेले नव्हते. आम्ही समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. युतीच्या काळात किती खर्च झाला ते जरुर मांडा. वस्तुस्थिती समोर येईल असे आव्हानही मुंडे यांनी दिले. पुढे ते म्हणाले, मागास भागांना न्याय देण्याची भूमिकाच या मंत्र्यांची नाही. अन्यायाची परिसिमा झाली. ज्या जयंत पाटलांनी एकाही वर्षी निर्देश पाळले नाहीत ते आता काय पाळणार आणि कोण विश्वास ठेवणार. त्यामुळे आता वेगळा विदर्भ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हे झाले नाही तर ही एका भागाची वसाहत होईल, लोकांना न्याय मिळणार नाही असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. झारखंड, उत्तरांचल सारखी छोटी राज्ये यशस्वी झाली आहेतच. असेही त्यांनी सांगितले.

तुमचे सरकार आले तरीही तुमची स्वतत्र विदर्भाची भूमिका कायम राहील का. यावर बोलताना त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विचार जरुर करु असे सांगितले. तसेच केंद्रात आमचे सरकार आले तर आम्ही तसा निर्णयही घेऊ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

आता जी अवस्था आहे त्यावर तुम्ही काय केले असते या प्रश्नावर बोलताना मुंडे म्हणाले, जागतीक बँक ३० वर्षासाठी कमी दराने कर्ज देते, ते घ्यावे लागेल, राज्याचे रिसोर्सेस वापरावे लागतील, कर्जरोखे उभे करावे लागतील आणि विजनिर्मितीला जोडून काही धरणे बीओटी तत्वावर देता येतील असे होऊ शकते पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी. या सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही तर काय होणार… असेही मुंडे शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *