शनिवार, २० एप्रिल २०२४
20 April 2024

राजकारण

काँग्रेसची ७८ विधानसभा मतदारसंघात आघाडी

मराठवाडा, कोकण, खानदेशात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. २९ – राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४८ पैकी १७ जागी यश मिळवले आणि २८८ पैकी ७८ विधानसभांमध्ये मताधिक्त ! विद्यमान विधानसभेत काँग्रेसचे ७१ आमदार आहेत. याचा अर्थ सात ठिकाणी

काँग्रेसने अधिकचे मताधिक्य मिळवले आहे. मात्र मराठवाडा, कोकण, खानदेश या तिन ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती अतीशय नाजूक बनलेली आहे.

एकीकडे पक्षाची स्थिती सुधारल्याच्या आनंदात नेतेमंडळी आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालू आहे. अनेक महामंडळं रिक्त असताना, अनेक समित्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या असताना देखील काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल पक्षात वरिष्ठ पातळीवर खाजगीतही आर्श्चय व्यक्त केले जात आहे हे विशेष.

विदर्भात २१ विधानसभेत आघाडी

विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत ज्यापैकी काँग्रेसने २१ ठिकाणी आघाडी घेतली आहे. विदर्भात मावळत्या लोकसभेत काँग्रेसकडे केवळ नागपूरची जागा होती. आता रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर, अशा जागा काँग्रेसने जिंकल्या. वर्ध्यात आत्तापर्यंत प्रभाराव आणि प्रमोद शेंडे यांच्यातील वादाचे फटके कायम पक्षाला बसत आले. यावेळी मात्र तो वाद फारसा समोर आला नाही आणि दत्ता मेघे यांनी सगळ्यांना सोबत नेण्याची वापरलेली युक्ती कामी आली. चिमुर-गडचिरोलीमध्ये देखील राष्ट्रवादीने आतून विरोध करुनही मारोतराव कोवासे हे स्वतच्या जनसंपर्काच्या आधारे निवडून आले. यवतमाळमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि उत्तमराव पाटील यांच्यातील रस्सीखेच पक्षाला महागात पडली. तर शांताराम पोटदुखे आणि नरेश पुगलिया यांच्या वादाचा फटका देखील पक्षाला सहन करावा लागला. शेतकरी आत्महत्या आणि त्यावरुन झालेले राजकारण याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात काँग्रेसने मिळवलेले यश कौतुकाचेच म्हणावे लागेल.

पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने सांगली, पुणे आणि कोल्हापूर या तीन लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्या तिनही त्यांनी जिंकल्या. सांगलीत वसंतदादांचा वारस पाडायचाच या ईर्षेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही नेते मैदानात उतरले होते. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मदन पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि ती जागा काँग्रेसला जिंकता आली. विशेष म्हणजे विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे सख्खे साडू अजित घोरपडे त्यांच्या विरोधात असताना देखील ही जागा येऊ शकली. पुण्यात एकट्या शरद पवारांनी सुरेश कलमाडींसाठी मागचे विरोध विसरुन काम केले ज्याचा फायदा कलमाडींना झाला पण अजित पवार यांनी मात्र शेवटपर्यंत पुण्यात पाय ठेवला नव्हता. काँग्रेसने उमेदवारी देऊ केलेल्या शिर्डीमध्ये देखील रिपाई नेते रामदास आठवले यांना दारुण पराभव पत्करावा लागला. एकाही विधानसभेत त्यांना मताधिक्य मिळाले नाही. दोन्ही काँग्रेसने शेवटपर्यंत तेथे मनासारखे काम केलेच नाही. एकूणच काँग्रेसची प. महाराष्ट्रात वाताहत होणार हे बोलले जात असताना १३ विधानसभांवर काँग्रेसने आघाडी मिळवली आहे व राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

खानदेशात बिकट अवस्था

खानदेशात तीन जिल्हे येतात. ज्यात २० विधानसभा आहेत. येथे धुळ्याची जागा काँग्रेसच्या अंतर्गत भांडणामुळे गेली. तर रोहीदास पाटील यांनी शेवटपर्यंतच मैदानात पाऊल न टाकल्याचाही फटका पक्षाला बसलाच. नंदुरबारची जागा देखील कशीबशी पक्षाने टिकवली. दरवेळी लाखो मतांनी निवडून येणारे माणिकराव गावीत यांना यावेळी ७०-८० हजाराच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. त्याला राष्ट्रवादीची ‘मैत्री’ कारण असल्याचे आता बोलले जात आहे.

कोकणात राणेंचा विजय

कोकणात मात्र काँग्रेसचे यश हे केवळ आणि केवळ नारायण राणे यांचेच यश मानावे लागेल. मात्र कोकणातील चार जिल्ह्यातील ३९ विधानसभांपैकी काँग्रेसला केवळ ९ विधानसभांमध्ये मताधिक्य मिळालेले आहे. त्याऊलट शिवसेनेची कामगिरी कोकणात कितीतरी चांगली आहे. रत्नागिरी-सिंधूदूर्ग मध्ये निलेश राणेंच्या रूपाने काँग्रेसने शिवसेनेची जागा मिळवली. रत्नागिरीत मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. ए.आर. अंतुले रायगडमधून पराभूत झाले त्याला त्यांच्याबद्दलची नाराजीची भावना जशी कारण होती तसेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हात राखून केलेला प्रचार आणि सेनेला शेकापची मिळालेली साथ ही कारणे ही त्यात होती. ठाण्यात लोकसभेचे चार मतदारसंघ. येथे भिवंडी काँग्रेसला नव्याने मिळाली तर पालघरचा उमेदवार चुकीचा होता या प्रचाराने त्या जागेचा बळी गेला.

मराठवाड्यात काँग्रेसची अवस्था बिकट

मराठवाड्यात काँग्रेस वाढली ती खऱ्या अर्थाने लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यातच. बाकी जिल्ह्यात व मराठवाड्याच्या राजधानीत; औरंगाबादेत पक्ष वाढावा म्हणून पक्षश्रेष्ठींनी कधीही पाच वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. पक्षाला व स्थानिक नेत्यांना कधी ताकद दिली नाही. उलट पक्षात गटबाजी कशी वाढेल याकडेच नेत्यांनी कायम लक्ष दिले. किंबहुना त्याला प्रोत्साहन दिले. या सगळ्या राजकारणातही औरंगाबाद शहरात आ. राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना मताधिक्य दिले. मागील लोकसभेच्यावेळी देखील शहरातून पक्षाला मताधिक्य होते. लातूरची जागा आली नसती तरच नवल होते. त्यातही त्या विजयाला विलासराव-मुंडे यांच्या मैत्रीची झालर आहेच. तर नांदेड मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाजपा नेते मुंडे यांचे आभार मानावेत असेच चित्र होते. कारण विद्यमान भाजपा खासदाराला डावलून संभाजी पवारांना तेथे तिकीट दिले गेले. जालन्यात देखील काँग्रेस वाढावी म्हणून कधी जाणीवपूर्वक प्रयत्नच झाले नव्हते. व विद्यमान राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांनी नवा पक्ष कशाला वाढवा या न्यायाने काँग्रेसच्या विजयात फारसे लक्ष दिलेच नाही. त्यामुळे आज मितीला मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मिळून असणाऱ्या ४६ विधानसभेपैकी केवळ ११ विधानसभेत काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे. त्याउलट दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या विभागात भाजप-सेनेचे घेतलेली आघाडी काळजी निर्माण करणारी आहे हे वास्तव आहे.

मुंबईत मनसे कृपेने विजय

मुंबईत भाजपा-सेना आणि मनसेची मतं एकत्र केली तरीही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता असे म्हणण्याजोगी एकमेव जागा होती ती प्रिया दत्त यांची. बाकी सर्व ठिकाणी मनसेच्या कृपेने काँग्रेसचा विजय अतिशय सोपा करुन झाला. त्याचवेळी मुंबईतील ३६ पैकी ९ विधानसभेत काँग्रेसने आघाडी घेतली आहे ही बाबही तेवढीच लक्षणीय म्हणावी लागेल.

(प्रसिध्दी ३० मे २००९)

राष्ट्रवादीला ५३ विधानसभा मतदारसंघांत आघाडी

मते वाढली, पण पश्चिम महाराष्ट्रातच राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले !

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. ३० – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ ५७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या ६८ जागा आहेत. त्याचा विचार करता राष्ट्रवादीला ११ विधानसभा मतदारसंघांत कमी मताधिक्य मिळाले आहे. एकीकडे मतांच्या संख्येत जरी वाढ झाली असली तरी राष्ट्रवादीची पीछेहाट पक्षालाच चिंताजनक आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला केवळ ३१ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. कोकण आणि विदर्भात केवळ ७ जागांवर तर मराठवाड्यात ६, मुंबईत ५ आणि खानदेशात एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे.

विदर्भात समाधानकारक यश नाही

विदर्भात भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीने महत्प्रयासाने जिंकली. तेथे पक्षाच्या व्यूहरचनेचा त्यांना फायदा झाला आणि बंडखोर नाना पटोले यांनी भाजपाची मते खाल्ल्याचाही त्यांना फायदा झाला. अमरावतीत मात्र गवईंसाठी मेहनत करूनही राष्ट्रवादीला ती सीट जिंकता आली नाही. नंतर या अपयशाचे खापर गवईंनी सुनील देशमुख यांच्यावर फोडून टाकले. बुलढाण्याची जागा सहज येईल, असे गृहीत धरणाऱ्या राष्ट्रवादीला शिवसेनेचे प्रताप जाधव चांगलेच भारी ठरले. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

पश्चिम महाराष्ट्रात जबरदस्त फटका

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही दोघे स्वतच्या करिश्म्यावर निवडून आले तर उदयनराजे भोसले हेदेखील व्यक्तिगत प्रतिमेमुळे विजयी झाले. कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, शिरुर, अहमदनगर या जागा राष्ट्रवादीला अतिशय वाईट पद्धतीने गमवाव्या लागल्या. कोल्हापुरात सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी यांची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडली. नाशिकमध्ये मराठा आणि ओबीसी असे सरळ दोन गट पडले. त्यातही शांतिगिरी महाराजांनी अर्ज मागे घेतल्यामुळे समीर भुजबळ यांना त्याचा फायदा झाला. अन्यथा, त्यांचीही जागा धोक्यात आली होती. शिर्डीची रामदास आठवले यांची उमेदवारी दोन्ही काँग्रेसला मान्य नव्हती. त्यातही राष्ट्रवादीने आठवलेंच्या अपयशाची पावती काँग्रेसच्या नावाने फाडण्यात मुत्सद्देगिरी दाखवली. नगरमध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीने निरोप दिल्याच्या बातम्या आल्या त्यावरून ही जागा राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नको होती की काय, असे चित्र समोर आले. या सगळ्यांचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या अनेक जागांवर होण्याची शक्यता आहे. येथे ८५ पैकी केवळ ३१ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे.

खानदेशात दारुण स्थिती

खानदेशात जळगाव आणि रावेर या दोन जागा राष्ट्रवादीने लढल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी पक्षाची अवस्था विस्कळीत होती. वसंतराव मोरे, रवींद्र पाटील यांच्यावर असणारी मदार फारशी कामी आली नाही. त्यातही सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खानदेशात राष्ट्रवादीला खिंडारच पडले. भरीस भर म्हणून की काय, काँग्रेसनेही खानदेशात फारशी साथ दिली नाही. परिणामी, खानदेशातील २० विधानसभांपैकी केवळ एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे. खानदेशात राष्ट्रवादीची जी अवस्था झाली, तेवढी दारुण अवस्था इतर कोणत्याही पक्षाची झालेली नाही.

कोकणात सात विधानसभांमध्ये मताधिक्य

कल्याणचे आनंद परांजपे यांची प्रतिमा राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंपेक्षा उजवी ठरली. त्यामुळे डावखरेंना पराभव पत्करावा लागला. ठाण्याची जागा मात्र राष्ट्रवादीला नव्याने मिळवता आली. त्यातही शिवसेनेच्या उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा जास्त मदतीला आली. कोकणात ३९ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी केवळ ७ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीला मताधिक्य आहे.

मराठवाड्यात राष्ट्रवादीचा फडशा

मराठवाड्यात राष्ट्रवादीने सहा मंत्री दिले. १ केंद्रीय राज्यमंत्री दिला. मात्र, केवळ मंत्रिपद देऊन विभागाचा विकास मात्र झाला नाही. मंत्रिपदे मराठवाड्याला, कामे मात्र पश्चिम महाराष्ट्रात, ही राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्याच अंगाशी आली. पर्यायाने परभणीत सुरेश वरपुडकरांनी केलेले प्रयत्न वाया गेले. हिंगोलीत शिवसेनेने राष्ट्रवादीला पराभवाचा जबर झटका दिला. बीडमध्ये राष्ट्रवादी संपल्यात जमा झाली. केवळ उस्मानाबादची एकमेव जागा, तीदेखील निसटत्या मतांनी राष्ट्रवादीला सांभाळता आली. पर्यायाने मराठवाड्यातील ४६ विधानसभांपैकी केवळ ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे.

मुंबईत लोकसभेची केवळ एक जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्णय घेतला होता. मनसे फॅक्टरमुळे ही जागा राष्ट्रवादीला जिंकता आली मात्र त्यातही केवळ एका विधानसभा मतदारसंघांमध्येच त्यांना आघाडी मिळवता आली. बाकी मुंबईत काँग्रेसनेच आघाडी मिळवली आहे. अनेक महत्त्वाची खाती, मोठमोठ्या नावाचे मंत्री असूनही राष्ट्रवादीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. विद्यमान विधानसभेत राष्ट्रवादीचे ६८ आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ५७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. ही राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब आहे.

विदर्भातील ११ जागी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबईत ४ विधानसभा मतदारसंघांत, पश्चिम महाराष्ट्रात २५ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मराठवाड्यातही १६ विधानसभा मतदारसंघांत, खानदेशात १० विधानसभा मतदारसंघांत आणि कोकणात ६ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे.

(प्रसिध्दी ३१ मे २००९)

भाजपाला ६७ विधानसभांमध्ये आघाडी

१३ ची साथ फायद्याची की तोट्याची?, मुंडे-गडकरीवादाचा भाजपाला फटका

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. ३१ – लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४ जागांचा फटका बसला. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळी भाजपाचे मतदान मोठ्या प्रमाणावर कमी झाले, तरीही भाजपाला राज्यातील ६७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान विधानसभेत भाजपाचे संख्याबळ ५४ होते. त्याचा विचार करता त्यांना १३ विधानसभांमध्ये जास्ती यश मिळाले आहे. आता हा १३ चा आकडा राज्यातल्या भाजपासाठी सुदैवी ठरतो की दुर्देवी याचे उत्तर विधानसभा निकालानंतरच मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने मताधिक्य मिळवले आहे. विदर्भात मात्र भाजपाची दारुण अवस्था झाली आहे. तेथे केवळ १४ विधानसभा मतदारसंघांत त्यांना मताधिक्य मिळाले आहे. खानदेशात १३ तर मुंबई आणि कोकणात प्रत्येकी ५ विधानसभा मतदारसंघांत भाजपाला मताधिक्य मिळाले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलीच महागात पडला आहे. गडकरींना उणेपणा देण्याची यासारखी चांगली वेळ नाही, असे म्हणत मुंडे यांना मानणारा वर्ग गडकरींच्या विरोधात गेला. पूनम महाजन यांना गडकरींनी तिकीट मिळू दिले नाही, अशी त्यांची प्रतिमा तयार केली गेली. तर दुसरीकडे लातूरला टी.पी. कांबळे आणि नांदेडला डी.बी. पवार-पाटील यांना गडकरींची इच्छा असूनही मुंडे यांनी तिकीट मिळू दिले नाही. नगरच्या दिलीप गांधी यांना कधी काळी प्रमोद महाजनांचा विरोध होता. त्यांना गडकरींनी बोलावून उमेदवारी दिली. तर पुण्यातला उमेदवार मुंडे गटाचा असल्याचे चित्र तयार केल्यामुळे तेथे गडकरींना मानणाऱ्यांनी पक्षाचा प्रचार केला नाही. या सगळ्या शह-काटशहात भाजपामध्ये मुंडे-गडकरी गट अप्रत्यक्षपणे एकमेकांसमोर उभे राहिले. पक्षातल्या काही नेत्यांनी देखील या दोघांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढेल कशी यासाठीच जास्त प्रयत्न केले. या सगळ्यांचा फटका भाजपाच्या चार लोकसभेच्या जागांना बसला. भाजपाची मते तब्बल १० लाखांनी कमी झाली. पण आश्चर्यकारकरीत्या ६७ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने मताधिक्य घेऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले. हे स्थान वास्तवात आणायचे की नाही याचा निर्णय आता राज्यातल्या भाजपा नेत्यांना घ्यावा लागणार आहे.

भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, वर्धा या जागा भाजपासोबत होत्या. मात्र, या वेळी महादेव शिवणकरांसारखा जुना नेता दूर राहिला. त्याचा परिणाम भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुरमध्ये जाणवला. नागपूरची जागा मिळेल, असे वाटत असताना तीही हातातून गेली. बसपाला ज्या पद्धतीची मते हवी होती, ती मिळाली नाही. मागच्या वेळी बसपाला मिळालेल्या मतांचा फायदा भाजपाला झाला होता. तोही या वेळी त्यांना विदर्भात झाला नाही. असे असले तरी विदर्भात भाजपा १४ विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरची जागा मुत्सद्देगिरी कमी पडल्यामुळे हातातून गेली. पुण्याची जागा मुंडेविरोधी गट बाहेर न पडल्यामुळे गेली. दिंडोरीची जागा मात्र भाजपाने कशीबशी राखली. या सगळ्या साठमारीतदेखील भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात १५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे.

खानदेशात मात्र एकट्या एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत नव्याने आलेल्या सुरेशदादा जैन यांच्या मदतीने दणदणीत यश मिळवले. मुंडे-गडकरीवादाची सावलीही खडसे यांनी पडू दिली नाही. रावेर, जळगाव या जागा भाजपाने राखल्या. तर धुळ्याची जागा मिळवली. नंदुरबारला मात्र प्रयत्न करूनही भाजपाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे खानदेशात २० विधानसभांपैकी तब्बल १३ विधानसभांवर भाजपाने मताधिक्य मिळवले आहे. खानदेशातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना पुरते संपवण्यातही भाजपाने यश मिळवले आहे.

कोकणात पालघर, भिवंडी हे दोन्ही ठिकाणचे उमेदवार तगडे असूनही तेथे भाजपाचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळेच की काय, कोकणात ३९ विधानसभांपैकी केवळ ५ विधानसभा मतदारसंघांत भाजपाला आघाडी मिळाली आहे.

मराठवाड्यात मात्र भाजपाने चांगले यश मिळवले. त्याचे श्रेय अर्थातच गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाते. मुंडे यांनी बीडच्या लोकसभा मतदारसंघात एकहाती यश मिळवून दाखवले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संबंधीत असणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघांत २ विधानसभा मतदारसंघ सोडले तर बाकी विधानसभा मतदारसंघांत भाजपाने आघाडी मिळवली. लातूर आणि नांदेड या दोन लोकसभेच्या जागा मात्र भाजपा जिंकू शकत असतानाही गमावल्याची खंत भाजपा नेत्यांमध्ये आजही आहे. मराठवाड्यात ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी १५ ठिकाणी भाजपाने मताधिक्य मिळवले आहे.

मराठवाड्यात ९ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत तर विदर्भात १९ विधानसभा मतदारसंघांत, कोकणात ६ विधानसभा मतदारसंघांत, पश्चिम महाराष्ट्रात २९ विधानसभा मतदारसंघांत तर मुंबईत ६ विधानसभा मतदारसंघांत व खानदेशात ३ विधानसभा मतदारसंघांत भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

(प्रसिध्दी १ जून २००९)

शिवसेनेला ६३ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य

मनसेने दमवलेल्या शिवसेनेला विधानसभेचा मार्ग कठीण

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. १ – लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या त्यात शिवसेनेने ६३ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे विद्यमान विधानसभेत शिवसेनेचे ६३ च आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला लोकसभेची निवडणूक फायद्याची ठरली नाही. मात्र, संभाव्य नुकसानीची चाहुल या निवडणुकीने दिली आहे.

मराठी मते आपल्यापासून का दुरावली, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. तो उद्धव ठाकरे यांना मान्य असो किंवा नसो. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी मात्र हा सल्ला चांगलाच मनावर घेतलेला आहे आणि प्रत्येक जण मराठी मतांवर ‘अक्सीर’ इलाज शोधण्याच्या मागे आहे.

शिवसेनेने विदर्भात १७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळवले आहे. त्याखालोखाल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी १५ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. मराठवाड्यात १४ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळवणाऱ्या सेनेला मुंबईत मात्र केवळ २ विधानसभा मतदारसंघांवर समाधान मानावे लागले आहे. हा झटका जबरदस्तच म्हणावा लागेल. दुसरीकडे शिवसेनेला लोकसभेत झालेल्या मतदानाचा विचार केला तर शिवसेनेची मतेदेखील ६ लाखांनी कमी झाली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने मारलेली मुसंडी ही जमेची बाजू असली तरी जी शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाणार की नाही, याची चर्चा आणि घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. त्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अर्थात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने १५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली, हाही एक योगायोगच. शिवसेना भाजपासोबत राहणार की राष्ट्रवादीसोबत जाणार, या घोळात जबाबदार नेत्यांकडून स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे महत्त्वाचे दिवस वाया गेले. भाजपालाही गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच युतीचे शिलेदार खचून गेले. सेना-भाजपा केडरमध्ये मनोमिलन झालेच नाही. बिनीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांनी एकमेकांसाठी कामही केले नसल्याची चर्चा आता अनेक कार्यकर्ते खाजगीत सांगतात. या सगळ्यांचा परिणाम शिवसेनेवर झाला.

विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जागा शिवसेनेने जिंकल्या. मात्र, रामटेकची जागा त्यांना गमवावी लागली. मुळात रामटेकची जागा पोटनिवडणुकीत शिवसेनेने जिंकली होती; परंतु तगडा उमेदवार न दिल्याने ही जागा पुन्हा काँग्रेसने पळवली. यवतमाळ आणि वाशिमच्या विजयात काँग्रेस नेत्यांची साखरपेरणी झाल्याची चर्चा कार्यकर्ते आजही करत आहेत. विदर्भ सेनेने राखला, भाजपाने गमावला, अशी काहीशी अवस्था विदर्भाची झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही मावळ, शिरुर, शिर्डी या जागा शिवसेनेने जिंकल्या. नाशिकला मात्र शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबरदस्त फटका बसला. तरीही पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी गेल्या वेळच्या तुलनेने चांगली राहिली आहे. शिवसेनेचे ‘भगवे तुफान’ इचलकरंजी, सातारा या भागात मात्र वावटळीच्याच रूपाने समोर आले.

खानदेशात शिवसेनेची फारशी कामगिरीच नव्हती. उलट भाजपाच्या यशात शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांचा मोठा वाटा राहिला. त्याउलट कोकणात शिवसेनेसाठी महत्त्वाची असणारी सुरेश प्रभू यांची जागा त्यांना गमवावी लागली. प्रतिष्ठेची ठाण्याची जागाही शिवसेनेच्या हातून गेली. नाशिक, ठाणे, मध्य मुंबई येथील उमेदवार तुलनेने कच्चे आहेत, अशी चर्चा सुरुवातीपासून होत होती. या तीनही जागा गेल्यामुळे शेवटी ती चर्चा खरी ठरली. या जागांवरील पराभव शिवसेनेची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा हिसकावून घेतल्यामुळे तेथे नव्याने व्यूहरचना करण्याची गरज निर्माण झाली आहे.भाजपा-शिवसेनेतील बिघाडीचा फटकाही युतीला बसला. मात्र, मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला नुकसान झाले ते मनसेमुळे.

मराठवाड्यात औरंगाबादची जागा राखताना शिवसेनेला नाकी नऊ आले. एकेकाळी औरंगाबादची जागा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. हा बालेकिल्ला राखताना मात्र शिवसेनेला या वेळी मोठे कष्ट पडले आहेत. औरंगाबाद शहरात शिवसेनेला मताधिक्यच मिळाले नाही. परभणीची जागा जाणार असे म्हणत असताना शिवसेनेने राखली, तर हिंगोलीची जागाही पुन्हा शिवसेनेने मिळवली. मराठवाड्यात उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती. मात्र, तेथे सेना-भाजपा नेत्यांत सख्य नव्हते. सेनेचे नेते गाफील राहिले. जागा सहज येईल या आविर्भावात वावरत राहिले. उमरगा, औसा हे मतदारसंघ सेनेकडे असतानाही तेथे अत्यंत कमी मताधिक्य शिवसेनेला मिळाले. औसाहून सेनेचे आमदार दिनकर माने तीन वेळा निवडून आले. मात्र तेथून शिवसेनेला मिळालेले नाममात्र मताधिक्य कशाचे द्योतक मानावे? मराठवाड्यातील सेना नेते काँग्रेसच्या संपर्कात अधिक असतात, ही चर्चाही सेनेला महागात पडली.

शिवसेनेला २८८ पैकी ६३ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले असले तरी शिवसेनेला मुंबईत फारसे यश मिळालेले नाही. मुंबईत १४ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात ११ विधानसभा मतदारसंघांत, मराठवाड्यात ८ विधानसभा मतदारसंघांत, कोकणात १२ विधानसभा मतदारसंघांत आणि विदर्भात ७ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

उद्धव ठाकरे हे एकमेव अस्र शिवसेनेने या निवडणुकीत वापरले. तर मुंबईतील नेते मुंबईतच निष्प्रभ ठरले, असे चित्र या निवडणुकीने उभे केले आहे.

(प्रसिध्दी २ जून २००९)

मनसेला ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी

लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत ११ विधानसभांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. २ – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला अदखलपात्र समजणाऱ्या तमाम राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकत मनसेने ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली. एवढेच नव्हे तर ११ विधानसभा मतदारसंघांत या नव्या पक्षाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. लोकसभेच्या केवळ १२ जागा लढवणाऱ्या या पक्षाने हे दणदणीत यश मिळवले. त्याच वेळी शिवसेना-भाजपा युतीचा मार्गही कठीण करून ठेवला.

मुंबईत पाच विधानसभा मतदारसंघांत तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघांत या पक्षाने पहिल्या पसंतीची मते मिळवली आहेत. मराठी मतांना मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वळवून घेत राज ठाकरे यांनी ज्या मुंबईत शिवसेना वाढली त्या मुंबईतच पक्षाच्या अस्तित्वावर घाला घातला. त्यामुळे मुंबईत ३६ विधानसभांपैकी शिवसेनेला केवळ २ विधानसभा मतदारसंघांत तर भाजपाला ५ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेता आली. मुंबईत मनसेच्या मतदानामुळे मोहन रावले निवडून येतील, असा अंदाज बांधणाऱ्यांनादेखील मनसेने खोटे पाडले. मनसेचे उमेदवार कोण आहेत, याचा विचार न करता लोकांनी राज ठाकरे यांना मतदान करायला पाहिजे, एवढ्या एकाच भावनेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि ७२ विधानसभा मतदारसंघांमधून या पक्षाने १५,८३,७६७ मते मिळवली. ७२ पैकी ९ विधानसभा मतदारसंघांत पहिल्या पसंतीची तर ११ विधानसभा मतदारसंघांत दुसऱ्या पसंतीची मते मिळवली आहेत.

विधानसभेच्या एकूण २८८ जागांचा विचार करता राज ठाकरे यांच्या मनसेने २५ टक्के (७२ विधानसभा) जागा लढवल्या असे गृहीत धरले तर त्यांना २८ टक्के यश मिळाले असे म्हणता येईल.

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेत फारसा चमत्कार घडवून आणणार नाही. पाच-पन्नास हजार मते मिळाली तरी खूप झाली, अशा स्वरूपात या पक्षाची हेटाळणी केली गेली. मात्र, मनसेने १२ पैकी १० लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी दीड ते दोन लाखांच्या घरात मते मिळवली.

कोकणात भिवंडी ग्रामीण, कल्याण (पश्चिम) तर मुंबईत मागाठणे, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर (पश्चिम), शिवडी, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक (पश्चिम), देवळाली अशा ९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली.

तर डोंबिवली, ठाणे, मुलुंड, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे (पूर्व), वरळी, नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), इगतपुरी या ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मनसे आणि राष्ट्रवादीमधील मतांचे अंतर फक्त २२,0३२ एवढे होते. येथे शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. त्यांना केवळ १,५८,२५१ मतांवर समाधान मानावे लागले. याच नाशिकमध्ये नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), इगतपुरी या ३ विधानसभा मतदारसंघांत मनसे दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर नाशिक (पश्चिम) आणि देवळाली या दोन ठिकाणी पहिल्या क्रमांकावर.

मुंबईत मनसेच्या सर्व ६ उमेदवारांनी सव्वा लाखाच्या पुढेच मते मिळवली तर भिवंडी आणि मुंबई उत्तर-पूर्वमध्ये मनसेच्या उमेदवारांनी दोन लाखापर्यंतचा पल्ला गाठला.

मराठीचा मुद्दा शिवसेनेचा आहे. तो मनसेने पळवला, असा आक्षेप घेत शिवसेनेने मराठी मतांसह उत्तर भारतीय मतांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मराठी लोकांनी मनसेला जवळ केले. मनसेला मतदान केल्यामुळे काँग्रेसचा फायदा होतो, असा प्रचार शिवसेनेने सुरू केल्यामुळे आता मतदार पूर्णपणे मनसेच्या बाजूने तरी जातील किंवा शिवसेनेच्या. अशा एका नाजूक वळणावर आज मनसे उभी आहे. एक नवा पक्ष केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राज्यभर रान पेटवतो आणि लोकसभेसारख्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करतो, या एकाच गोष्टीमुळे मनसेचे उमेदवार निवडून न येताही कौतुकाला पात्र ठरले आहेत. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वतीने कसा उचलला जातो, हाही कुतूहलाचा विषय ठरणार आहे. मनसेने किमान दीडशे विधानसभा मतदारसंघांत आपली माणसे उभी केली तर भल्या भल्यांची मती गुंग होईल, अशी आज अवस्था आहे.

ज्या पक्षाला सुरुवातीपासून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा-शिवसेनेने कायम हेटाळणीच्या स्वरूपात पाहिले. मनसेला पाच-पन्नास हजार मते मिळतील. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे नेटवर्क नाही, अशा पक्षासोबत कोण उभे राहणार, असा प्रचार केला गेला. तोच पक्ष आज राज्यात प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. मनसेला गृहीत धरल्याशिवाय असंख्य विधानसभा मतदारसंघांची गणिते पूर्णच होणार नाही, असे आज चित्र आहे.

बसपाने राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. विदर्भवगळता राज्यभर बसपाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना उपद्रव होईल, अशी मते मिळवली नाहीत. मात्र, प्रत्येक मतदारसंघात हजारापासून ते ४०-५० हजारांपर्यंतची मते बसपाने मिळवली आहेत. राज्यातील नागपूर उत्तर आणि आहेरी या दोनच विधानसभा मतदारसंघांत या पक्षाने दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवली आहेत. बाकी सर्व ठिकाणी या पक्षाला यश मिळाले नाही. ज्या हेतूने बसपाने उमेदवार उभे केले किंवा अनेकांनी बसपाचे उमेदवार आपल्याकडे उभे राहावे, यासाठी प्रयत्न केले. तो प्रयत्न कोठेही यशस्वी झाला नाही. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले. त्याच वेळी प्रकाश आंबेडकर, सुलेखा कुंभारे आणि रामदास आठवले या रिपाइं नेत्यांनाही नाकारून त्या जागी इतर पक्षाच्या उमेदवारांना लोकांना पसंती दिली आहे. बसपाला राज्यात फारसे स्थान मिळाले नाही, ही रिपाइं नेत्यांसाठी आनंदाची आणि त्यांना स्वतला नाकारले, ही दुखाची अशा दोन्ही बाजू या नेत्यांसमोर आहेत.

(प्रसिध्दी ३ जून २००९)

शिवसेनेला मुंबईत मनसेने रोखले !

मुंबई शहरात सेनेला खातेही उघडता आले नाही तर मुंबई उपनगरात केवळ ४ जागा सेनेला मिळाल्या !
ठाण्यात सेनेला ५ तर भाजपाला ४ जागांवर समाधान, काँग्रेसने ठाणे जिंकण्याची संधी घालवली !

अतुल कुलकर्णी

मुंबई, दि. २२ – सत्ता सोपानाकडे निघालेला शिवसेना-भाजपाचा अश्वमेघ मुंबईत मनसेने जोरदारपणे रोखला शिवाय पदार्पणातच आपल्या पक्षाला दणदणीत यश मिळवून दिले. जो १३ आकडा मनसेला अशूभ आहे असे भविष्यकार सांगत होते तेवढ्याच म्हणजे १३ जागा घेत मनसेने महाराष्ट्राच्या विधानसभेत दमदार पाऊल टाकले आहे. तेरापैकी ८ जागा एकट्या मुंबई-ठाण्यातून मनसेने मिळवल्या. त्याशिवाय मुंबई-ठाण्यातील ६० जागा राज्याचा मुख्यमंत्री ठरवतील हे भाकित देखील या निकालाने खरे ठरवले. या दोन जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीने २६ जागा पटकावल्या. भाजपा सेनेला मात्र ६० पैकी केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेमुळे मुंबईतील डिंडोशी, कांदिवली पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चेंबूर, कुर्ला, अणुशक्तीनगर, वडाळा, वरळी, भायखळा, कुलाबा आणि कलिना या तेरा जागी युतीला पराभव पत्करावा लागला आणि मनसेचा १३ चा आकडा सेनेला अशूभ ठरला. ठाण्यात देखील कळवा-मुंब्रा, बेलापूर, एरोली या तीन जागा मनसेमुळे शिवसेना-भाजपाला गमवाव्या लागल्या.

सेनेला ठाण्यात ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे या तीन जागा मिळाल्या त्या देखील मनसेशी कडवी झुंज देत! त्या जागी काँग्रेस्